निवडणूक आयोगाची लगबग ; 216 नगरपालिका ; 25 जि.प साठी मोठा आदेश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता लगबग सुरू केली आहे.
त्यानुसार प्रभाग रचनेच्या पहिल्या टप्प्यासाठीचे काम सुरू झाले आहे. या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात निवडणूक आयोगाची तयारी पाहता त्या लवकरच होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात 25 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांसाठीची प्रभागरचना रखडलेली आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवून प्रभागरचना मागवून घेतली आहे. त्यासाठी येत्या आठ तारखेपर्यंत जिल्हानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात निवडणूक आयोगाने पाठविलेल्या पत्रात १० मार्च २०२२ रोजी असलेली प्रभाग रचनेची कार्यवाही ज्या टप्प्यावर होती तेथपासून पुढे आयोगाने कार्यवाही चालू ठेवावी, असा आदेश न्यायालयाने दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेच्या कामकाजावर पुढीलप्रमाणे कार्यवाही होणार आहे.
१ ) नकाशे गुगल नकाशावर सुपर इंपोज करणे २ ) जनगणनेची आकडेवारी लिंक करणे इत्यादी . या कामकाजाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रभाग रचनेचे कामकाज हाताळणारे एक अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे तसेच जनगणनेची आकडेवारी , निवडणूक विभाग / निर्वाचक गणाची गावनिहाय आकडेवारी आणि नकाशे सॉफ्ट कॉपीसह ) आयोगाच्या कार्यालयात बोलविण्यात आले आहे.
नगरपरिषद/नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचना
राज्यातील विविध 216 नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 10 ते 14 मे 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कार्यवाही 10 मार्च 2022 रोजी असलेल्या टप्प्यांपासून पुढे सुरू करावी, असा आदेश 4 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ही कार्यवाही सुरू केली आहे. यात 208 नगरपरिषदा व 8 नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 10 ते 14 मे 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यावर जिल्हाधिकारी 23 मे 2022 पर्यंत सुनावणी देतील. प्रभाग रचनेचे प्रारूप 10 मार्च 2022 रोजीच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी प्राप्त झालेल्या व आता नव्याने प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर एकत्रित ही सुनावणी देण्यात येईल. अंतिम प्रभाग रचना 7 जून 2022 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.