मनसेच्या खांद्यावरुन भाजपानं हिंदुत्वाच्या गळा घोटला; राऊतांचा आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात आज पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. कारण मशीदीवरील भोंग्यांवरून राज ठाकरेंनी आक्रमक होत हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता.
त्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेसह भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. हा हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. हिंदुंसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. भाजपने मनसेला पुढे करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या आधाराने भाजपने हिंदुत्वाचा गळा घोटला. लाऊडस्पीकर न लागल्याने लोखो हिंदू भाविकांची गैरसोय झाली. आज सकाळपासून अनेक लोकांनी तक्रारी केल्या आहेत, असेही राऊत म्हणाले. प्रमुख हिंदू स्थळांवरील आरती अनेकांना ऐकता आली नाही. शिर्डील्या लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही ही परिस्थिती राहिली, असेही राऊतांनी यावेळी सांगितले.
हिंदुत्वासाठी आजचा काळा दिवस
हिंदुत्वासाठी आणि श्रद्धावंतांसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. उद्या हिंदू रस्त्यावर उतरले तर आश्चर्य वाटणार नाही. मात्र मी मुख्यमंत्र्यांच्या वतीने आवाहन करतो की हिंदुनो संयम राखा, तसेच मशीदीवरील भोंग्यांचा निर्णय हा कायद्यानुसारच होईल. एक कायदा सगळ्यांसाठी आहे. हा वाद पसरवून हिंदुंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. यामागे भाजपचं मोठं कारस्थान आहे, असा थेट आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसेच लहान पक्षांना हाताशी धरून भाजप राजकारणासाठी वापर करून घेत आहे. हा कायदेशीर विषय आहे, न्यायालय आहे. पोलीस व्यवस्था आहे ते याबाबत निर्णय घेतील. अनेक ठिकाणी भजन किर्तनाचे कार्यक्रम होते, ते रद्द करावे लागले. याला जबाबदार नवहिंदू ओवेसी आहेत, असे म्हणत राऊतांनी पुन्हा राज ठाकरे यांंना डिवचलं आहे.
पुन्हा मनसे विरुद्ध शिवसेना
या भोंग्यांच्या मुद्द्यांवरून पुन्हा मनसे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष तापला आहे. राज ठाकरेंची गुढी पाडव्याची सभा पार पडल्यापासून मनसे भोंग्यांविरोधात जोरदार आक्रमक झाली आहे. कालच राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी लेखी आदेश काढत भोंगे उतरवण्याच्या भूमिकेवर ठाम असून जिथे अजान लागेल तिथे हनुमान चालीसा लावा, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांकडून आता मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकडही सुरू आहे. येत्या काळात हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार आणि पोलीस प्रशासन याबाबत काही ठोस भूमिका घेणार का? याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.