भोंग्यांच्या आंदोलनात आता सदावर्तेची उडी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- हनुमान चालिसा, भोंग्यांच्या प्रकरणी सरकार मुस्कटदाबी करत आहे. हनुमान चालिसा वाचणे गुन्हा आहे का, असा सवाल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
ते पुण्यात बोलत होते. राज्यात सध्या भोंग्यांचा विषत तापला आहे, मनसेने याविषयी अल्टिमेटम दिला होता. त्याप्रमाणे राज्यात मशिदींवर भोंगे वाजविल्यास त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचे म्हटले होते. त्यावरून मनसेच्या नेत्यांची धरपकडही राज्यात सुरू झाली. या वादात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. राज्य सरकार भोंग्यांच्या आणि हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून मुस्कटदाबी करत आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलले पाहिजे, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. राज्य सरकारवर त्यांनी या मुद्द्यावरून टीका केली आहे.
‘…यामुळे समाजात तेढ’
गुणरत्न सदावर्ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन याठिकाणी आले होते. कोर्टाच्या आदेशानुसार येथे आल्याचे त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. भोंग्यांच्या मुद्द्यावर त्यांना विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. राज्यघटनेने सर्वांनाच धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. अशावेळी कोणी हनुमान चालिसा म्हणत असेल तर त्याचा काय गुन्हा, असा सवाल करत ही मुस्कटदाबी आहे, असा घणाघात त्यांनी सरकारवर केला. यामुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याचेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. याप्रकरणी शरद पवार यांच्या मध्यस्थीची गरज त्यांनी बोलून दाखवली. दरम्यान, एसटी आंदोलन आणि त्यातील वादग्रस्त भूमिकेमुळे विविध पोलीस स्टेशनमध्ये सदावर्तेंवर गुन्हे दाखल आहेत. आता त्यांनी भोंग्यांच्या आंदोलनातही उडी घेतली असून सरकारला पुन्हा एकदा लक्ष केले आहे.
मनसे कार्यकर्त्यांची धरपकड
कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राज्यात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी पोलिसांनी घेतली. ही भूमिका आजच्यापुरती नसून यानंतरही भोंगे वाजल्यास भोंग्यानेच उत्तर देणार, असे मनसेने म्हटले आहे.