राज ठाकरेंच्या सभेत पोलिसांच्या “त्या” 16 अटी पैकी किती पाळल्या…? ; पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- आज औरंगाबादेत राज ठाकरेंची सर्वात मोठ्या सभांपैकी एक सभा पार पडली. या सभेआधीच सभेला जोरदार विरोध होत होता.
या सभेमुळे धार्मिक हिंसा भडकू शकते अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या सभेला परवानगी देताना पोलिसांनी मनसेला एकूण सोळा अटी घालून दिल्या होत्या. ही सभा झाल्यानंतर या सभेतील किती अटी पाळल्या गेल्या. बऱ्याच अटी पाळल्या गेल्या नाही. तर याबाबत आता पोलीस काय पाऊलं उचलणार आणि ही सभा शांततेत पार पडण्यामागे पोलिसांनी काय प्लॅनिंग केलं होतं, याबाबत औरंगाबदचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी सविस्तर माहिती दिली. सभा पार पडल्यानंतर त्यांनी टीव्ही 9 शी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी पडद्यामागचे प्लॅनिंग सांगितले आहे. या सभेसाठी आम्ही आधीपासून सज्ज होतो. या सभेसाठी विशेष प्लॅनिंग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, तसेच किती अटी पाळल्या गेल्या आणि काही अटी मोडल्या असतील तर त्याचा अभ्यास करून निर्णय घेऊ असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
नियम मोडले असतील तर काय कारवाई होणार?
राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी सोळा नियम घालून दिले होते. त्यात वक्तव्यापासून ते उपस्थिती आणि मार्गांबाबत अटी होत्या. राज ठाकरे यांनी या सभेत धर्मावर तर बोललेच मात्रमशीदीवरील भोंग्यांवर तुफान टीका केल्याने आता पोलीस याबाबत काय भूमिका घेणार असेही पोलीस आयुक्तांना विचारण्यात आले. त्यावेळी पोलीस आयुक्त निखील गुप्ता म्हणाले. किती नियम मोडले याबाबत अद्याप मला माहिती मिळाली नाही. आम्ही या सर्व गोष्टींचा अभ्यास करून पुढे काय करायचे याचा निर्णय घेऊ, त्यामुळे आता पोलिसांच्या अभ्यासात त्यांच्या हाती काय माहिती लागतेय आणि पोलीस काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र पोलिसांनी ही सभा जशी शांततेत पार पाडली आणि परिस्थिती मोठ्या कौशल्याने हाताळली, त्याबाबत त्यांचं आता कौतुक होत आहे.
सभेसाठी काय प्लॅनिंग केलं?
औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता सभेच्या प्लॅनिंगबाबत बोलताना म्हणाले, काही दिवस आधीपासून या सभेसाठी पोलिसांचं प्लॅनिंग सुरू होते. लोकांचे येण्याचे मार्ग आधीच ठरवले गेले होते. त्यांची बसण्याची पद्धतही ठरवण्यात आली होती. तसेच पार्किंगची व्यवस्था आणि तिथून सभास्थळी येणारे मार्गही ठरवले गेले होते. बसण्याच्या जागीही अनेक सेक्टर पाडले गेले होते. त्या सेक्टरवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली होती. जिथे काही गडबड दिसेल ते सीसीटीव्हीत बघून तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना हातळण्यास सांगण्यात येत होते. यात अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मेहनत लागली होती, अशी माहिती त्यांनी प्लॅनिंगबाबत दिली आहे.