लाऊडस्पीकरला धार्मिक रंग देणार असाल तर आम्ही धर्मानंच उत्तर देवू :- राज ठाकरे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभेला सुरुवात झाली आहे. या नियोजित सभेनं यापूर्वीच महाराष्ट्रात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.
सुरुवातीला राज यांच्या सभेला परवानगी देण्यात आली नाही, पण आता १६ अटी-शर्तींसह औरंगाबाद पोलिसांनी परवानगी दिली आहे. राज ठाकरे यांनी सध्या उपस्थित केलेला भोंग्यांचा मुद्दा, महाविकास आघाडी सरकारवरील सडकून टीका आणि हिंदुत्वाचा फुंकलेला नवा हुंकार यापार्श्वभूमीवर ते आज काय बोलतील याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज ठाकरे : मला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. मुस्लीम समाजानं हे समजून घेतलं पाहिजे.लाऊडस्पीकर हा समाजीक विषय पण जर तुम्ही त्याला धार्मिक रंग देणार असाल तर त्याला आम्ही धर्मानंच उत्तर देऊ. जर उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही? सुप्रीम कोर्टानंही सांगितलंय की यासाठी परवानगी घ्यावी लागते पण आता कोणीही परवानगी घेतलेली नाही. देशातील सर्व लाऊडस्पीकर खाली आले पाहिजेत सर्वांना समान धर्म असला पाहिजे.
राज ठाकरे : पवारांना हिंदू या शब्दांचीच अॅलर्जी आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहेच पण ते शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन पुढे गेले आहेत. मी जात मानत नाही मी कोणा ब्राह्मण समाजाची बाजू इथं मांडत नाहीए. आमच्याकडे जातीनं विळखा घालून ठेवलाय. ज्या महाराष्ट्रानं इतके उद्दात्त विचार दिलेत तो जातीत सडतोय. त्याचा दिवस साजरा करायचा आम्ही?
राज ठाकरे : इतकी वर्षे सत्तेत होता तर खेचून आणायचा होता त्याला आणि विचारायचं कोणी माहिती दिली तुला.
राज ठाकरे : तुम्हाला अपेक्षित असेलली प्रबोधनकारांची पुस्तकं तुम्ही वाचली आहेत. माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलं आहे ते परिस्थितीला धरुन आहे. ते व्यक्ती सापेक्ष आहे. जातीपातीत भेद निर्माण करणारं नव्हे. हिंदू धर्म मानणारा माणूस होता तो. धर्माच्या चुकीच्या गोष्टींवर भाष्य करणारा तो माणूस होता.
राज ठाकरे : माझी दोन भाषणं काय झाली त्यावर सगळे फडफडायला लागले. शरद पवार म्हणाले ते दुही माजवतायत. देशासाठी हे योग्य नव्हे. तुम्ही जाती-जातीत जे खेळ मांडलेत ना त्यामुळं दुही माजतेय. हातात पुस्तक घेतलं तर त्याचे लेखक कोण आहेत? याची सुरुवात होते. मी बोलल्यानंतर त्यांनी महाराजांचा उल्लेख करायला लागलेत.
राज ठाकरे : टिव्हीवर रोज चाललंय हे राजकारण आहे का? हा आपला महाराष्ट्र आहे का? समाजवादाचा विचार, ज्योतीबाचा विचार, हिंदुत्वाचा विचार, कम्युनिस्टांचा विचार या महाराष्ट्रातून गेला. यांची विधानं आम्ही हसण्यावारी घेत आहोत. यासाठीच आम्ही महाराष्ट्र दिन साजरा करतोय का? आणि आज आपण काय महाराष्ट्राची अवस्था करुन ठेवलीए. कोणी मुद्द्याचं बोलतच नाहीए सर्वजण गुद्द्यांवर बोलताहेत.
राज ठाकरे : बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आमच्या लोकांच्या अंगात देवी येते भूतं येतात. पण जेव्हा या समाजाच्या अंगात शिवाजी नावाचं भूत येईल ना तेव्हा सर्व जग पादक्रांत करुन टाकू आपणं. हे काय व्यक्य म्हणालेत आंबेडकर.
राज ठाकरे : शिवाजी महाराजांचं स्वराज्याला लढा देण्यासाठी औरंगजेब इथं आला आणि पुढची २७ वर्षे तो इथं राहिला आणि इथचं मेला. संभाजीराजे आणि ताराराणी त्याच्याविरोधात लढले. या काळात त्यांना पत्र पाठवलीत त्यात तो म्हणतो शिवाजी अजूनही मला छळतोय. त्या औरंगजेबाला कळलं होतं छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. जर हा आपल्या भूमीत पसरला तर आपलं काही खरं नाही.
राज ठाकरे : अल्लाउद्दीनं खिल्जीचं सैन्य येतंय ही पहिली फेकन्यूज होती. रामदेवरायांची कन्येला घेऊन खिल्जी पळून गेला. जे इतिहास विसरले त्यांच्या पायाखालचा भूगोल सटकला. पुढचे ४०० वर्षे महाराष्ट्रातील मातांवर अन्याय झाले.
राज ठाकरे : सरकारची उरलीसुरली आता संभाजीनगरमध्ये काढू म्हटलं. महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे इतरही अनेक प्रश्न आहेत.
राज ठाकरे : मुंबईतील सभेनंतर अनेकांनी टीका केली. ठाण्याच्या सभेनंतर दिलीप धोत्रेंनी सांगितलं की आपण संभाजीनगरला एक सभा घेऊयात. संभाजीनंतर हा तर महाराष्ट्रातील मध्य. हा विषय फक्त संभाजीनगरपूरता मर्यादित नाही. यापुढच्या माझ्या सर्व सभा आता मराठवाड्यात होणरा आहेत. तसेच विदर्भात, कोकणात, पश्चिम महाराष्ट्रातही सभा होतील.
अभिजीत पानसे : शाहीर साबळे यांच्यावर चित्रकृतीचं उद्घाटन होणार आहे. त्यांचा नातू केदार शिंदे यांनी सर्व मांडणी केली. शाहीर साबळेंच्या भूमिकेत सुपरस्टार अंकुश चौधरी काम करणार आहे.
अभिजीत पानसे : आज ही सगळी जी ऊर्जा आहे ती जपून ठेवा. संभाजीनगरमध्ये जर एवढ्या लोकांनी काम केलं तर पुढचा महापौर राज ठाकरेंचा असेल. आजही जनजागृती अनेक वर्ष करत आहेत. एकटा माणूस सर्वांच्या विरोधात उभा आहे. माझी विनंती आहे सर्वांना राज ठाकरेंच्या मागे सर्वांनी उभं रहायला हवं.
राज ठाकरे सभास्थळी दाखल, लवकरच होणार राज गर्जना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच सभास्थळी दाखल होणार आहेत.
राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर मनसेचे कार्यकर्त्यांची गर्दी झाली असून मैदान पूर्णपणे भरलं आहे. बाजूच्या जागा उपलब्ध नसल्यानं भिंतींवरही लोक बसलेले दिसून येत आहेत.
मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंसह मनसेचे कार्यकर्ते सभास्थळी रवाना झाले आहेत.
अभिजीत पानसे : राज ठाकरे आजच्या सभेत जे आदेश देतील त्याची तंतोतंत पालन केलं जाईल. तसेच कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी गृहमंत्रालयाची असेल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन सरकारनं करावं.
राज ठाकरेंच्या सभेपूर्वी आंबेडकरी कार्यकर्त्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. भीम आर्मी आणि वंचित बहुजन आघाडीनं राज ठाकरेंच्या या सभेला विरोध केला आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतून निघालेल्या आंबेडकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
सभास्थानी मोठ्या प्रमाणावर गर्दी लक्षात घेता मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून या सभेसाठी येणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार इथं घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.
राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मनसेचे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी सभेसाठी हजेरी लावत आहेत.