नागरिकांना लोकशाही दिनात तक्रार करण्याची गरज पडू नये या साठी शासकीय कार्यालयांनी कार्यप्रणालीत सुधारणा करावी :- जिल्हाधिकारी अमोल येडगे ; लोकशाही दिनात 110 तक्रारी प्राप्त….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 03 जानेवारी :- जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज एकूण 110 तक्रारी प्राप्त झाल्या. शासकीय कार्यालयांनी नागरिकांच्या तक्रार अर्जावर नियमितपणे व्यवस्थित कार्यवाही केल्यास त्यांना विनाकारण तक्रार दाखल करण्यासाठी यावे लागणार नाही. नागरिकांना लोकशाही दिनात तक्रार करण्याची गरज पडू नये यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी आपली कार्यप्रणालीत सुधारणा करावी तसेच अभ्यागतांना वेळ देवून नियमानुसार त्यांच्या तक्रारीचा निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
प्रत्येक महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे व इतर कार्यालय प्रमुख प्रत्यक्ष व दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, छोट्या छोट्या गोष्टीसाठी अर्जदारांना लोकशाही दिनात यावे लागल्यास संबंधीत कार्यालयामार्फत नागरिकांचे अर्जावर काय कारवाई करण्यात येते, अभ्यागतांना वेळ दिला जातो किंवा नाही, अर्जदार किती वेळा भेटले याबाबत संबंधीत कार्यालयाचीच चौकशी करण्यात येईल व तक्रारीसाठी विभागप्रमुखांना जबाबदार ठरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यापुर्वीच्या सर्व प्रलंबित तक्रारी 7 जानेवारी पर्यंत निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले.
याप्रसंगी विविध विभाग प्रमुख व अधिकारी हजर होते.