भाजपा विरोधात तुम्ही पुढाकार घेणार का…? शरद पवार म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देशात सध्या भाजपविरोधात जर पर्याय उभा करायचा असेल तर विरोधी पक्षांना एकत्र यावं लागेल अशी भूमिका अनेक बड्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय राजकारणात अॅक्टीव्ह होत तिसऱ्या आघाडीची मोट बांधायला सुरूवात केल्याचं दिसून आलं.
त्यामुळे हा मुद्दा अधिकच तापला आहे. याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्भूमीवर विरोधी पक्षांनी आतापासूनच कटुता बाजूला ठेऊन संवादाला सूरूवात केली पाहिजे.
देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरण्याची जाबाबदारी काँग्रेसची असली पाहिजे, त्यात काँग्रेस कमी पडते हे बंगालच्या निवडणुकीने दाखविले, असे आपल्याला वाटते का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता ते म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये आम्ही सारेच सुरुवातीला एकत्र होतो. निवडणूक जाहीर झाली, तेव्हा मात्र आमच्यात एकवाक्यता राहिली नाही. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी वेगळी भूमिका स्वीकारली. ममतांना दुबळे करण्याची भूमिका घेऊ नये, असे आम्हाला वाटत होते. आपण उमेदवार दिले तर, त्याचा फायदा भाजपला होईल, हे काँग्रेस आणि डाव्या मित्रांना पटवून देता आले नाही. त्यातून कटूता तयार झाली. आताच ममता महाराष्ट्रात येऊन गेल्या. काँग्रेस संदर्भातील त्यांची काही वाक्ये आम्हाला आवडली नाहीत. हे आमचे मत नाही, असे मी त्यांच्यासमोरच स्पष्ट केले. पण आता ही कटूता संपविली पाहिजे आणि एकत्र येण्याच्या प्रक्रियेला हातभार लावला पाहिजे.
यासाठी आपण पुढाकार घेणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, साधारणतः चर्चा करतो आहे. माझे वय असेल किंवा संसदीय अनुभव असेल, (मी विधिमंडळ किंवा संसदेत सलगपणे कार्यरत आहे, त्याला यंदा ५४ वर्षे होतील. यात एक दिवसही खंड नाही.) त्यामुळे सहाजिकच लोक चर्चेला येतात, बोलणे होते. यात भाजप सोडून इतर पक्ष आहेत. कटूता आहे ती घालविण्यासाठी, एकवाक्यता साधण्यासाठी संवादाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. लोकसभा निवडणुकीला अजून दोन-तीन वर्षे आहेत. पण निदान आता ही प्रक्रिया सुरु केली पाहिजे. लोकांना पर्याय हवा आहे. त्यासाठी खूप काळजीपूर्वक एकत्र राहावे लागेल. लोकांत विश्वास तयार करावा लागेल. या कामात माझे लक्ष आहे.