मराठवाडा-विदर्भासह पुण्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, वादळी वाऱ्यांसह वरुणराजा बरसला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील वातावरण अचानक बदललं आहे. यंदाच्या हंगामातील मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. पुढील काही तासांत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असतानाच महाराष्ट्रात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळं आता गेल्या काही महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड आणि धाराशीव या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, धाराशीव तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. प्रचंड उकाडा असल्याने नागरिकांच्या जीवाची लाही-लाही होत होती. परंतु दुपारी बारा वाजेनंतर अवकाळी पावसाने चांगलाच जोर धरला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तसेच कन्नड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यांमुळं जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पत्रे उडाले असून शेकडो झाडे कोसळल्याची माहिती आहे. याशिवाय विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या आहे.
पुणे शहरात अवकाळी पावसाची हजेरी…
मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. पुणे शहरातील भेकराईनगर, हडपसर, रेसकोर्स परिसर, मावळ आणि दक्षिण पुणे शहराच्या भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहे. त्यामुळं आता येत्या काही दिवसांत राज्यात मान्सूनचं आगमन होण्यापूर्वीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे.