ठाकरेंनीच जायला सांगितले; केसरकर यांचा दावा ; ‘मविआ’ तून बाहेर पडण्याचे आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोल्हापुर :- ”काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फसविले आहे. ठाकरे यांनीच आम्हाला जायला सांगितले. एवढेच नव्हे तर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ठाकरे यांनी काँग्रेस-”राष्ट्रवादी’कडून आपली फसवणूक झाल्याची कबुली दिली होती, असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी केले.
दोन्ही काँग्रेसशी असणारी युती ठाकरे यांनी तोडावी.
आजही आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहे, असेही ते म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्री अंबाबाई मंदिरातील विकासकामांना सुरुवात केली आहे. याची पाहणी करण्यासाठी केसरकर आज कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘कोणत्याही पक्षाची सभा ही विराटच होत असते. तशीच उद्धव ठाकरे यांचीही झाली. दरवेळी आम्ही खोके घेतले म्हणून माजी मंत्री आदित्य ठाकरेंकडून टीका केली जाते. मात्र खोक्यांसोबत खेळण्याची सवय आदित्य यांना लहानपणापासूनच आहे, अशी टीका केसरकर त्यांनी केली.
मंत्री केसरकर म्हणाले, ‘आम्ही जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविला म्हणून त्यांनी आमदार केले आहे. विकत जायचे असते, तर अडीच वर्षांत केव्हीही आम्ही गेलो असतो. उद्धव ठाकरे यांना आम्ही फसवले नाही. त्यांनीच आम्हाला निघून जायला सांगितले, ही बाजू जनतेसमोर कधीतरी मांडली पाहिजे.”
फसवणूक झाल्याची मोदींसमोर कबुली
”दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपली फसवणूक झाल्याची कबुली दिली होती. हिंदुत्वाचा विचार सोडल्याबद्दल चूक झाल्याचे त्यांनी कबूल केले होते. महाराष्ट्रात गेल्या गेल्या ती चूक दुरूस्त करू असा शब्द दिला होता. मात्र तो शब्द मोडत त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर भूमिका बदलली. शब्द आम्ही मोडला नाही, तर तो उद्धव ठाकरे यांनी मोडला. आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो, मात्र त्यांनी आम्हाला निघून जायला सांगितले. आता ते उलट सांगत आहेत,” असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.