महंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवबंधन बांधले आहे.
अनेक दिवसांपासून ते शिवसेना ठाकरे गटात सामील होणार असल्याची चर्चा होती. सुनील महाराज यांनी संजय राठोड यांच्यावर नाराजी व्यक्त केली. राठोड शिवसेना सोडून शिंदे गटात गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुनील महाराजांना शिवबंधन बांधून मैदानात उतरवले आहे. ठाकरे यांनी महाराजांना लोकसभेच्या 5 आणि राज्यातील 5 जागांवर बंजारा उमेदवार देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा आहे. यावर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महंत सुनील महाराज यांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड म्हणाले, “कुणाला कुणाकडे जायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. लोकशाहीत कुणालाही कुठे जाण्याचा अधिकार असतो. महंताना वाटलं म्हणून ते शिवसेनेत गेले.”
सुनील महाराज काय म्हणाले?
सुनील महाराज यांनी शिवबंधन बांधल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आज पोहरादेवी येथे पंचमीची यात्रा आहे. पंचमीचा मुहूर्त साधून मी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटलो. आमच्यात अतिशय सकारात्मक चर्चा झाली. राज्यातील बंजारा बांधवाना विकासामध्ये मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी, सत्तेमध्ये वाटा देण्याचे काम फक्त शिवसेनाच करु शकते. हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहे.”
शिवसेना एकच आहे-
उद्धव ठाकरे म्हणाले, सुनील महाराज यांच्या प्रवेशाने मला आनंद झाला. साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा. नवरात्रामध्ये सुनिल महाराज शिवसेनेत आले. केवळ ते एकटे आले नसून बंजारा समाजाचे लढवय्या सैनिक शिवसेनेत आले. यांच्या रक्तात गद्दारी नाही. दसरा मेळाव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना एकच आहे, आणि शिवसेनेचा दसरा मेळावा देखील एकच असतो.