सुप्रीम कोर्टातील आजच्या सुनावणीतले प्रमुख मुद्दे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट विस्तारित पीठाची, घटनापीठाची नियुक्ती करणार का, निवडणूक आयोगाच्या नोटिशीचं काय होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता उद्यावर गेली आहेत.
आज जवळपास दोन तास सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद झाले. त्यानंतर कोर्टाने उर्वरित सुनावणी ही उद्यावर नेली आहे.
आजच्या सुनावणीतले महत्त्वाचे मुद्दे
उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद
केवळ बहुमत आहे हे सांगून तुम्ही पक्षांतर बंदी कायद्याला हरताळ फासू शकत नाही
यांच्याकडे कायदेशीरदृष्ट्या केवळ एकच पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे विलीनीकरण, जो ते वापरत नाहीत
केवळ आमदार, खासदार म्हणजे मूळ राजकीय पक्ष नाही
एक गोष्ट अवैध ठरली की या घटनाक्रमातल्या अनेक गोष्टी अवैध ठरतात. सरकार, सरकारनं घेतलेले निर्णयही..ज्याचा करोडो लोकांवर परिणाम होतो. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने सुनावणी होणं गरजेचं
शिंदे गटाचा युक्तिवाद
अल्पमतातलं सरकार वाचवण्यासाठी पक्षांतर बंदी कायद्याची ढाल केली जाऊ शकत नाही
हे सरकार आम्ही पाडलेलं नाही, तर मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून राजीनामा दिला.
एखादा व्यक्ती, एखादं पद म्हणजे राजकीय पक्ष होऊ शकत नाही. आम्हाला आमचे मुख्यमंत्री भेटत नसतील तर एकत्रित निर्णयाचा अधिकार, आम्ही केलेली कृती ही
पक्षविरोधी नाही तर ती पक्षांतर्गत बाब आहे.
पक्ष सोडलेलाच नाही, त्यामुळे पक्षांतरबंदीचा विषय गैरलागू ठरतो
दोन्ही बाजूंचे हे युक्तिवाद ऐकताना सुप्रीम कोर्टाने केलेली टिपण्णीही महत्त्वपूर्ण ठरते.
शिंदे गटाकडून दावा केला जात होता की सभागृहाचे नवे अध्यक्ष हे बहुमताने निवडले गेले आहेत. त्यामुळे आता अपात्रतेसंदर्भातले अधिकार त्यांच्याकडे आहेत. सुप्रीम कोर्टाने यात पडू नये. पण सुप्रीम कोर्टाने त्यांना प्रतिप्रश्न केला की कोर्टात पहिल्यांदा कोण आलं, तुम्हीच आलात. मग त्यावेळी आम्ही 10 दिवसांचा अवधी दिला, ज्याचा तुम्हाला अप्रत्यक्ष फायदा झाला. मग आता यात पडू नका असं कसं म्हणता.
या सगळ्या प्रकरणात शिंदे गटाच्या वतीने प्रश्न उपस्थित करण्यात काही गोंधळ होतोय का असंही सुप्रीम कोर्टात दिसलं. कारण आज कोर्टाने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांना हे सगळे प्रश्न पुन्हा दुरुस्त करुन लिखित स्वरुपात द्यायला सांगितले आहेत. आता उद्या सकाळी सुनावणीनंतर सुप्रीम कोर्ट कुठल्या निर्णयापर्यंत येतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल