महाविकास आघाडीच्या विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार अखेर शेवटच्या क्षणी ठरले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 02 जुलै :- महविकास आघाडीच्यावतीने राजन साळवी यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
अवघे काही मिनीटे राहिले असताना शिवसेनेचे कोकणातील सामान्य कुटुंबातील निवडून आलेले आमदार राजन साळवी यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार चेतन विठ्ठल तुपे हे सुचक तर काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे अनुमोदक झाले आहेत. परंतु काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवत महाविकास आघाडीकडून शिवसेनेला संधी देत राजन साळवी यांचा अर्ज दाखल केला आहे.
काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मविआ सरकार असताना थोपटेच विधानसभा अध्यक्ष होतील असे सांगितले जात होते पण आता सरकार पडल्यानंतरही काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद मिळाले नाही, उलट ते अनुमोदक झाले असल्याने काँग्रेस नाराज होईल का बोलले जात होते परंतु त्यांनी राजन साळवी यांनी पाठींबा दिला आहे. दरम्यान भाजपकडून विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहूल नार्वेकर यांचे नाव निश्चित झाले आहे.
नाना पाटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार याचा फैसला रविवारी होणार आहे. अध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षानं मुंबईतील कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभा आमदार म्हणून पहिल्याच कार्यकाळात अध्यक्ष होण्याची संधी त्यांना चालून आलीय. नार्वेकर अध्यक्ष झाल्यास राज्याच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सर्वोच्च पद हे एकाच कुटुंबात जाण्याचा दुर्मिळ योग घडणार आहे.
नार्वेकरांचे सासरे रामराजे निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती आहेत. सातारा जिल्ह्यातील निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्याचे 29 वे वंशज आहेत. ते 1995 साली सर्वप्रथम फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी निंबाळकरांनी 22 अपक्षांना एकत्र करत तत्कालीन शिवसेना-भाजपा युती सरकारला पाठिंबा दिला होता. युती सरकारच्या त्या राजवटीमध्ये निंबाळकर हे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होते.
1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर निंबाळकर यांनी त्या पक्षात प्रवेश केला. विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये आधी राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्रिपद त्यांनी सांभाळले. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्य नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 2010 साली सर्वप्रथम विधान परिषदेवर संधी दिली. सध्य ते विधान परिषदेचे सभापती आहेत.