शेतकऱ्यांना वेळेमध्ये व सोप्या पध्दतीने पिक कर्ज मिळावे ; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे बँकर्सना दिशानिर्देश ; ३० जून पावेतो मागील पिककर्ज परत केल्यास व्याजात सवलत ; पीक कर्जासाठी मदत कक्ष स्थापन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. १९ जून :- शेतकऱ्यांना ३० जून च्या आत सोप्या पद्धतीने पीक कर्जाचे वाटप व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बँकर्सना दिशानिर्देश दिले असून पीक कर्ज वाटपात हयगय करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वाटपाकरीता पीक कर्ज मेळावे तसेच बँकेचा सतत आढावा व पाठपूरावा यातून शेतकरी लाभार्थ्यांना पीक कर्ज वितरणाबाबत जिल्हा प्रशासनातर्फे कार्यवाही केली जात असून दिनांक १८ जून २०२२ पर्यंत १ लाख ४६ हजार १०५ शेतक-यांना १३६१ करोड इतके कर्ज वाटप करण्यात आले आहे. सदर कर्ज वाटप हे उद्दीष्टाच्या ७५.६३ टक्के आहे. जिल्ह्यातील उर्वरीत पिक कर्जाकरीता राहीलेले शेतक-यांना पिक कर्ज जून महिण्याच्या आत मिळण्याचे दृष्टीने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत सर्व बँकांना निर्देश देण्यात आले आहे.
यानुसार सर्व बँकानी मागील खरीप हंगामामात पीक कर्ज घेतलेले शेतक-यांपैकी चालू हंगामात अद्यापपर्यंत पीक कर्ज न घेतलेले शेतकऱ्यांना दुरध्वनी तसेच भ्रमणध्वनी द्वारे मेसेज करुन पिक कर्ज घेण्याबाबत संदेश द्यावा व त्यांना तात्काळ पिक कर्ज देण्याची कार्यवाही पुर्ण करावी.
दिनांक ३० जून, २०२२ पावेतो शेतक-यांनी पिक कर्ज परत केल्यास शेतक-यांना व्याजात सवलत मिळणार आहे. ही बाब शेतक-यांना समजावून सांगावी. मागील वर्षी कर्ज घेतलेल्या शेतक-यांकडून कर्जाचा भरणा करुन घेवून नविन पिक कर्ज मंजूर करण्याची कार्यवाही सर्व बँकानी शेतक-यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून तसेच बँक कर्मचारी यांनी शेतक-यांना भेटी देवून पिक कर्ज वाटपाची कार्यवाही करावी.
शेतकरी सद्या खरीप हंगामाच्या कामात व्यस्त असल्यामूळे शेतक-यांनी पीक कर्जाकरीता बँकेत अर्ज केल्यास त्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मंजूर होईल व त्यांना बँकेत विनाकारण फेरफटका मारावा लागणार नाही, याबाबत बँकानी योग्य ती कार्यवाही करावी. तसेच पिक कर्ज प्रकरणात काही त्रुटी राहील्यास शेतक-यांना ती बँकेमार्फत तात्काळ समजावून सांगीतले जाईल व
त्रुटीचे निराकरण करुन पिक कर्ज शेतक-यांना प्राधान्याने मंजूर करण्याची कार्यवाही करावी. यासाठी सर्व बँकेचे शाखा व्यवस्थापक ह्यांचा दैनंदिन आढावा घ्यावा. जे शाखा व्यवस्थापक पिक कर्ज वाटपाच्या कामामध्ये हयगय किंवा विलंबातून कर्तव्यात कसूर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचावर बँक प्रशासनामार्फत प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
सरासरी पेक्षा कमी पिक कर्ज वाटप झालेल्या शाखा
व्यवस्थापक यांना कामात सुधारणा करणेबाबत नोटीस द्यावी. व कामात सुधारणा होण्याच्या दृष्टीने दिनांक २० ते २४ जून २०२२ या सप्ताहामध्ये सदर शाखांना जिल्हा प्रतिनीधी यांनी स्वतः भेटी द्याव्यात व काम सुधारणेबाबत नियोजन करावे.
पीक कर्जासाठी मदत कक्ष स्थापन
पिक कर्ज मिळण्याबाबत काही शेतक-यांना अडचणी येत असतील तर त्यांचे निराकारण करण्याकरीता निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडे (नैसर्गिक आपत्ती विभाग) येथे मदत कक्ष स्थापन करण्यात येत आहे. सदरील मदत कक्षाचे दुरध्वनी क्रमांक 07232-240720 असा आहे व व्हाटसअॅप भ्रमणध्वनी क्रमांक 7620046636 असा आहे. शेतक-यांना पिक कर्ज घेण्यास अडचण येत असल्यास त्यांनी त्यांची तक्रार सदरील क्रमांकावर नोंदवावी. प्राप्त समस्या/तक्रार संबधीत बँकेचे जिल्हा प्रतिनीधी यांचेकडे पाठविली जाईल. त्यांनी तक्रार प्राप्त झाल्यानतंर त्याचे निराकारण करुन चार तासाच्या आत कक्षाल अहवाल सदर सादर करणे बंधनकारक राहील. सदरील अहवालामध्ये बँक शाखेचे अधिकारी/कर्मचारी यांनी कामात हयगय केल्यास ते प्रशासकीय तसेच दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहतील.
उपरोक्त नमूद बाबींचे पालन न केल्यास संबधित
बॅक अधिकारी/कर्मचारी हे प्रशासकीय तसेच दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहतील, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.