‘देशातील हिंदू समाजाच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नसते’; नितीन गडकरींचं विधान चर्चेत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टव्यक्त पणासाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, त्यांनी देशातील हिंदू मंदिराबाबत मोठं विधान केलं आहे. देशातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छतेचं पालन केलं जात नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, आपला देश असा आहे की आपल्या देशात हिंदू समाजाची जी मंदिरं आहेत तिथे स्वच्छता नसते. धर्मशाळा चांगल्या नसतात. मी लंडनमध्ये एका गुरुद्वारात गेलो होतो, रोमच्या चर्चमध्ये जाऊन आलो काही देशांमधल्या मशिदीही पाहिल्या तिथलं वातावरण स्वच्छ होतं. ते पाहून मला हे कायमच वाटत होतं की आपली जी श्रद्धास्थानं आहेत ती स्वच्छ असली पाहिजेत.
मला जेव्हा यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली तेव्हा मी महाराष्ट्रातल्या देहू-आळंदी पालखी मार्गासाठी १२ हजार कोटींची मान्यता दिली. तुळजापूर, गाणगापूर, माहूर ही जी आपली श्रद्धास्थानं आहेत ती चांगल्या प्रकारे विकसीत करण्यासाठी आम्ही करतो आहोत, असंही नितीन गडकरी म्हणाले.