देशाला पुन्हा मागे नेण्याचा प्रयत्न ; शरद पवारांची टीका…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले असले तरी आमची जुन्या संसदेशीच बांधिलकी आहे. नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पाहता देशाला पुन्हा एकदा काही वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताचे संकल्पना मांडली. पंडित नेहरू यांनी विज्ञानावर आधारित समाजाची अपेक्षा केली होती. मात्र संसदेच्या उद्घाटनावेळी त्याच्या उलट झाल्याचे पाहायला मिळाले, असे पवार म्हणाले.
नव्या संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना निमंत्रित करणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जबाबदारी होती. कारण संसदेच्या कोणत्याही कामाची सुरुवात ही राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आणि त्यांच्या भाषणाने होते. अधिवेशनाची सुरुवातही राष्ट्रपतींच्या भाषणाने होते. राज्यसभेचे प्रमुख उपराष्ट्रपती आहेत. संसदेचा कार्यक्रम याचा अर्थ लोकसभा आणि राज्यसभा आहे. लोकसभेचे अध्यक्ष दिसले याचा आनंद आहे. पण राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती आहेत. पण त्यांची उपस्थितीही दिसली नाही. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम मर्यादित घटकांसाठीच होता का, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. या सोहळ्यात सगळ्यांना सहभागी करून घेतले असते तर ते अधिक चांगले दिसले असते, अशी नाराजीही पवार यांनी व्यक्त केली.