शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा ; २.१६ लाख विद्यार्थ्यांचा ‘टेट’चा निकाल जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून पार पडलेल्या ‘टेट’चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दोन लाख १६ हजार ४४३ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून आता राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिक्षक भरतीसाठी आता ‘टेट’ बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, २०१९ च्या शासन निर्णयानुसार निश्चित झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित ‘टेट’ची प्रश्नपत्रिका काढण्यात आल्या. पण, परीक्षा खूपच कठीण होती, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. दरम्यान, ‘आयपीबीएस’ संस्थेच्या माध्यमातून राज्यातील ९३ केंद्रांवर ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडली होती.
या परीक्षेत एकपेक्षा अधिक गुण घेतलेला विद्यार्थी देखील उत्तीर्ण असणार आहे. पण, शिक्षक भरती करताना मेरिट यादीवरूनच होणार आहे. जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्याला निश्चितपणे शिक्षक होण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, ५० ते ७० गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जात आहे. पण, त्यासंबंधीचा आढावा दोन-तीन दिवसांत घेतला जाणार आहे. त्यानंतर हा निकाल शालेय शिक्षण विभागाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची पदभरती व खासगी संस्थांमधील शिक्षक भरती पार पडेल.
ठळक बाबी…
‘टेट’चा निकाल नुकताच जाहीर
२.३९ लाख विद्यार्थ्यांपैकी परीक्षेला बसले होते २ लाख १६ हजार ४४३ विद्यार्थी
२०० पैकी १८६ गुण मिळवलेला विद्यार्थी राज्यात प्रथम
१०० पेक्षा कमी गुण मिळालेल्यांची संख्या लक्षणीय
‘टेट’ निकालामुळे राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा