बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर अजित पवार म्हणाले, “त्यांना फोन केला होता…”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमधील खदखद चव्हाट्यावर आली आहे. सत्यजीत तांबे यांच्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलीय.
दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. थोरातांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
सत्यजीत तांबे यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप करत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं. त्यानंतर आता थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. दरम्यान मंगळवारी (ता. ७) पुण्यात असलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांना थोरात यांचा राजीनामा आणि काँग्रेसमधील गटबाजीवरून प्रश्न विचारला.
अजित पवार म्हणाले, “बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची बातमी माध्यमांतूनच ऐकली. थोरात यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना फोन केला होता. त्यांना म्हणालो की, बाळासाहेब आज तुमचा वाढदिवस, आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं याच शुभेच्छा! दरम्यान एक बातमी कानावर येतेय, त्याबाबत आता तुम्हाला विचारावं की नको हे मला कळत नाही. यावर त्यांनीच सांगितले की, दादा, मी राजीनामा दिलेला आहे.”
यानंतर पवार यांनी थोरात काय म्हणाले याबाबत माहिती दिली. अजित पवार यांनी सांगितले, “बाळासाहेब थोरात म्हणाले की, दादा, मी राजीनामा दिलेला आहे. तो माझा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेणार आहे.”
दरम्यान काँग्रेसचे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी थोरात यांच्या राजीनाम्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. याबाबत अशोक चव्हाण म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्या राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्व काही करणार आहे.
आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच थोरात यांनी मोठे पाऊल उचलल्यामुळे सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात आगामी काळात कोणता निर्णय घेणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी, कुणालाही भाजपात यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करत आहोत, असे सूचक वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.