गांधीजी-विनोबांच्या भूमीत साहित्यिकांचा मेळा, आजपासून 96 वे मराठी साहित्य संमेलन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वर्धा :- स्वातंत्र्यलढय़ापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन चळवळींचे माहेरघर असलेल्या आणि महात्मा गांधी, विनोबा भावे यांचा वैचारिक वारसा जपणाऱ्या वर्धा नगरीत यंदाचे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे.
वर्धानगरी सारस्वतांच्या स्वागताला सज्ज झाली आहे. आजपासून राज्यभरातील साहित्यप्रेमी वर्ध्यात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान साहित्य संमेलन रंगणार आहे.
स्वावलंबी विद्यालयाच्या प्रांगणात 1969 साली म्हणजे 53 वर्षांपूर्वी साहित्य संमेलन पार पडले होते. याच प्रांगणात यंदाचे संमेलन होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक, न्यायमूर्ती (निवृत्त) नरेंद्र चपळगावकर संमेलनाचे अध्यक्ष आहेत. पटांगणाला महात्मा गांधी साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. एकूण 23 एकरांचा हा परिसर सुसज्ज करण्यात आला आहे. यामध्ये सहा भव्यदिव्य मंडप उभारले आहेत. मुख्य सभामंडपाला आचार्य विनोबा भावे यांचे तर मुख्य व्यासपीठाला प्राचार्य राम शेवाळकर यांचे नाव देण्यात आले आहे. याच व्यासपीठावर शुक्रवार, 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.कार्यक्रमाला मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे, ज्येष्ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, आमदार डॉ. विश्वजीत कदम, डॉ. पी. डी. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. त्याआधी ग्रंथदिंडी निघणार असून अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
संमेलनस्थळी मुख्य प्रवेशद्वार भव्य आकर्षक आहे. तब्बल 83 बाय 35 फुटांचे हे प्रवेशद्वार असून त्यावर महात्मा गांधीजींची सूत काततानाची प्रतिकृती आहे.
उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे शिक्षण व भाषा मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.
350 निमंत्रित वत्ते आणि साहित्यिकांचा सहभाग
पुस्तकांच्या प्रकाशनासाठी स्वतंत्र मंडप उभारला आहे. वर्धा संमेलनात 100 च्या आसपास पुस्तकांचे प्रकाशन होण्याचा अंदाज आहे. बाल मंचदेखील लक्षवेधी आहे.
कवी कट्टय़ावर पाचशेपेक्षा जास्त कवी कविता सादर करतील. अन्य मंडपात तीनही दिवस गझल कट्टा भरणार असून राज्याच्या विविध भागांतून आलेले 238 गझलकार आपल्या गझलांचे सादरीकरण करतील.
मनोहर म्हैसाळकर सभामंडप व आचार्य विनोबा भावे सभामंडपामध्ये तीन दिवस एकूण तेरा विषयांवर परिसंवाद होणार आहेत.