वंचित आघाडी-ठाकरे गट युतीवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; नाना पटोले म्हणाले, “या युतीला आमचा.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या निर्णयाचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वागत केलं आहे.
वंचित आघाडीशी युतीबाबत आम्ही सकारात्मक असल्याचे ते म्हणाले.
काय म्हणाले नाना पटोले?
”महाविकास आघाडी म्हणून बोलायचं झाल्यास वंचितच्या समावेशाबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही. तसा प्रस्ताव आला आणि प्रकाश आंबेकरांचं नेमकं म्हणणं काय आहे? हे स्पष्ट झालं की आम्ही त्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ. मुळात याबाबत आमची भूमिका सकारात्मक आहे. मी कालही सांगितलं की भाजपा हा संविधानिक व्यवस्था संपणारा पक्ष आहे. त्याला थांबवणं आमचं काम आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे लहान मोठ्या पक्षांना सोबत घेऊन चालणं ही आमची भूमिका आहे”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
”आम्ही स्वागतच करतो”
”आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी युती जाहीर केली आहे. राज्यातील शिवशक्ती-भीमशक्तीच्या एकत्र येण्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो, असेही ते म्हणाले. दरम्यान, वंचित ठाकरे गट युतीबाबत काँग्रेसशी चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते, त्यालाही नाना पटोले यांनी दुजोरा दिली. उद्धव ठाकरेंशी माझी चर्चा झाली. मात्र, वंचित आघाडीचा प्रस्ताव काय आहे? ते माहिती झाल्यानंतरच आम्ही भूमिका स्पष्ट करू”, असे ते म्हणाले.