‘डबल इंजिन’ मुळे मुंबईचा विकास..! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्वाळा ; मुख्यमंत्र्यांचा ‘ट्रिपल इंजिन’ साठी आग्रह…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ‘महाराष्ट्रात आधीच्या सरकारच्या काळात विकासकामे रोखण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे विकास खुंटला होता. मात्र, आता ‘डबल इंजिन’ सरकारमुळे मुंबईचा विकास होत आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईत केले.
‘देश आणि राज्याबरोबरच मुंबई महानगरपालिकेतही समर्पित भावनेने काम करणारे सत्ताधारी असतील तर येत्या काही वर्षांत मुंबईचा कायापालट होईल,’ असा विश्वास व्यक्त करत मोदी यांनी पालिकेची सत्ता भाजपच्या हातात देण्याचे अप्रत्यक्ष आवाहनच मुंबईकरांना केले.
वांद्रे- कुर्ला संकुलात सुमारे ४० हजार कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ, तसेच मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या लोकार्पणाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणिशग फुंकले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना आणि फेरीवाले व छोटय़ा दुकानदारांना पंतप्रधान स्वनिधी योजनेतून अनुदान वाटपही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे स्वरूप शासकीय समारंभाचे असले तरी, मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षाचे झेंडे, पंतप्रधानांच्या छबीचे फलक घेऊन दाखल झालेले भाजपचे हजारो कार्यकर्ते आणि भगवे झेंडे घेऊन जमलेले शिंदे गटाचे कार्यकर्ते यांनी वांद्रे-कुर्ला संकुलाचे मैदानच नव्हे, तर संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. व्यासपीठावर पंतप्रधानांचे आगमन होताच कार्यकर्त्यांच्या घोषणांनी वातावरण ‘मोदीमय’ झाले. या वेळी व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह नारायण राणे, पियूष गोयल, रामदास आठवले, डॉ.भागवत कराड, रावसाहेब दानवे हे केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा भर मुख्यत्वे मुंबईचा विकास आणि राजकारण या मुद्दय़ांवर होता. ‘भाजप किंवा रालोआने (एनडीए) विकासकामांमध्ये कधीही राजकारण आणले नाही. विकासाला कायमच प्राधान्य दिले. पण, महाराष्ट्रातील आधीच्या सरकारच्या काळात विकासकामांची अडवणूक झाली. त्यामुळे सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले,’ असे नमूद करत ‘मुंबईचे भविष्य कसे उज्ज्वल होईल’, असा सवालही मोदी यांनी केला. ‘बँकांमध्ये मुदत ठेवीत पैसे ठेवण्यापेक्षा तो विकास कामांवर खर्च झाला पाहिजे. त्यासाठी केंद्रात आणि राज्यात ‘डबल इंजिन’ सरकारप्रमाणेच जनतेसाठी समर्पित भावनेतून काम करणारे स्थानिक प्रशासनही असले पाहिजे. दिल्ली, राज्य सरकारच्या पातळीवर आणि मुंबईतही त्या पद्धतीने विकासकामे आणि सर्वसामान्यांचा विचार झाला पाहिजे’ अशी भूमिका त्यांनी मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने वेगाने कामे सुरू केली असल्याची स्तुती पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधानांचा मेट्रोतून प्रवास
बीकेसी येथील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंदवली मेट्रो स्थानकात एकात्मिक तिकीट प्रणालीच्या कार्डचे आणि ‘मुंबई १’ अॅपचे अनावरण केले. या स्थानकात भरविण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांनी केले. त्यानंतर पंतप्रधानांनी मोबाइल तिकीट खरेदी करून मेट्रोतून गुंदवली ते मोगरा, मोगरा ते गुंदवली असा प्रवास केला.
आता ‘डबल इंजिन’ सरकारने पुन्हा विकासकामांना वेग दिला आहे. त्यामुळे मुंबईतीलच नव्हे, तर आजूबाजूच्या जिल्ह्यांशी व राज्यांशी असलेली संपर्कयंत्रणा आणि दळणवळण सुधारेल. जनतेला आधुनिक, उत्तम दर्जाची आणि पर्यावरणपूरक वाहतूक साधने आणि पर्याय उपलब्ध होतील. बुलेट ट्रेन प्रकल्प आणि ‘वंदे भारत’ ही वेगवान रेल्वेसेवा मुंबईकरांसाठी उपलब्ध होईल.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
केंद्रात आणि राज्यातील सत्तेमुळे आपले सरकार ‘डबल इंजिन’चे आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीतही जोरदार विजय मिळवून तिहेरी इंजिन सुरू होईल आणि मुंबईच्या विकासाची गती आणखी वाढेल.
–एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी गेल्या २५ वर्षांत आपली घरे भरली. महापालिकेचा निधी मुदत ठेवीत ठेवला. पण, मुंबईकरांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारला नाही. आता ‘डबल इंजिन’ सरकार मुंबईतील सर्व प्रकल्प वेगाने मार्गी लावेल.
:- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री