“रोज सकाळी आमच्यावर टीका करणाऱ्यांना सांगू इच्छितो…” उदय सामंत यांचा संजय राऊत यांना टोला…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दावोसमध्ये विविध करार झाले आहेत. मी आमच्या रोज सकाळी उठून टीका करणाऱ्या हितचिंतकांना सांगू इच्छितो की शिंदे फडणवीस सरकारच्या काळातच महाराष्ट्राचा योग्य दिशेने विकास होतो आहे.
असं म्हणत उदय सामंत यांनी दावोसहून संजय राऊत यांना टोला लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसमध्ये जे भाषण केलं ते महाराष्ट्राच्या उद्योग जगताला आणि महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाला दिशा देणारं भाषण होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची जी पूर्ण टीम आली आहे. ती विविध सामंज्यस करार करण्यात यशस्वी झाली आहे. आम्ही त्यावरच थांबणार नाही तर या करारांची अंमलबजावणी कशी राज्यात होईल हे पाहणार आहोत असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
मागच्या वर्षी सुमारे ३० हजार कोटींचे MoU आले होते, ५० हजार कोटींचा एनर्जीचा MoU झाला होता. मात्र यापैकी राज्यात काहीही आलं नाही असं म्हणत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारलाही उदय सामंत यांनी टोला लगावला. इथे येऊन त्यांनी कुणाची भेट घेतली होती हा देखील प्रश्नच आहे असंही उदय सामंत म्हणाले. आज आम्ही दावोसमध्ये येऊन जे MoU केले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात विविध प्रकल्प येणार आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी उद्योग व्यापले गेले पाहिजेत असाच आमचा या दौऱ्यामागचा उद्देश आहे.
श्री श्री रविशंकर यांचा आशीर्वाद
अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनीही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसंच श्री श्री रविशंकर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक केलं. देवेंद्रजींच्या कामाचंही कौतुक केलं. बाकीच्या देशापेक्षा आपलं पॅव्हेलियन उत्कृष्ट आहे असा आशीर्वादही त्यांनी दिला. ज्या प्रमाणे राज्यातल्या जनतेची अपेक्षा होती त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. शिंदे फडणवीस सरकार उद्योगांना आहे त्यापेक्षा उभारी देईल असा मला विश्वास आहे. जे आम्ही सांगितलं होतं की दुप्पट MoU होती हे सांगितलं होतं ते चारपट झाले आहेत. हे झालं म्हणजे सगळं संपलं नाही. मात्र महाराष्ट्रात विविध प्रकल्प यावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठका घेतल्या. आमचं शिष्टमंडळ आलं होतं त्यांनी यशस्वीपणे सगळं पार पाडलं आहे हे आमच्यावर रोज टीका करणाऱ्यांना मला सांगायचं आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं आहे?
दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. या दौऱ्याबाबात मी आनंदी आणि समाधानी आहे. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच हे सामंजस्य करार फक्त कागदावरच राहणार नसून ते प्रत्यक्षात उतरतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
दावोसमध्ये मोदींचे आकर्षण
दावोसमध्ये विविध देशांचे प्रतिनिधी आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दावोसच्या परिषदेवर छाप पाहायला मिळाली. दावोसमध्ये मोदींचे आकर्षण असल्याचे आम्हाला दिसले. महाराष्ट्र हे प्रो इंडस्ट्रियल स्टेट असल्याचे आम्ही सर्वांसमोर मांडले. जे उद्योग महाराष्ट्रात येतील, त्यांना रेड कार्पेट अंथरु तसेच कर सवलत आणि विशेष पॅकेज देऊ, अशी घोषणा आम्ही दावोसमध्ये केली, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हे सरकार उद्योजकांना चालना देणारे आहे. उद्योगांसाठी आम्ही सिंगल विंडो सुरु केली असल्याचेही त्यांनी सांगितले.