ईडीची छापेमारी किती मोठे षड्यंत्र, याचा हा धडधडीत पुरावा..! हसन मुश्रीफ यांनी व्हिडीओ केला पोस्ट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते, माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या छापेमारीनंतर गेल्या पाच दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत.
हसन मुश्रीफ विरुद्ध किरीट सोमय्या असा सामना रंगला असतानाच आता थेट व्हिडिओ व्हायरल करत किती छापेमारी किती मोठे षड्यंत्र होते (Hasan Mushrif ED Raid) याचा हा धडधडीत पुरावा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी 33 सेकंदाची व्हिडिओ क्लिप व्हायरल करताना किरीट सोमय्या हे कशा पद्धतीने मोहीम यशस्वी झाल्याचे सांगत आहेत हे दाखवणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
मुश्रीफ यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
षड्यंत्राचा हा घ्या पुरावा………
घरावर रेड सुरू असतानाच किरीट सोमय्या म्हणाले, “हसन मुश्रीफच्या घरावर रेड सुरू झाली आहे, दिल्लीवाल्यांनी कमिटमेंट पूर्ण केली……!”
बुधवार दि. ११ जानेवारी २०२३ रोजी सकाळी सहा वाजता कागलमधील घरावर ईडीची रेड पडली. रेड सुरू असतानाच एबीपी माझाच्या महिला अँकरने किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया विचारण्यासाठी फोन केला. त्याचवेळी सोमय्या दुसऱ्या फोनवरून पलीकडील व्यक्तीला सांगत होते, “हसन मुश्रीफच्या घरावर रेड सुरू झाली आहे, दिल्लीवाल्यांनी आपली कमिटमेंट पूर्ण केली.”
दरम्यान, ईडीची छापेमारी झाल्यानंतर पाच दिवसांमध्ये किरीट सोमय्या उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या दौऱ्याला कोणत्याही प्रकारचा विरोध करू नये, असे आवाहन केलं आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून मुश्रीफ यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे उद्या किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याला विरोध होणार का? याची चर्चा रंगली आहे. मागील दौऱ्यात सोमय्यांना कडाडून विरोध झाला होता. त्यामुळे उद्या परिस्थिती तशी उद्भवणार का? याकडे आता कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या पायरी सुरू असतानाच आता समर्थकही आता आक्रमक झाले आहेत. शनिवारी मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक भैय्या माने, सूर्यकांत पाटील यांच्यासह समर्थकांनी समरजितसिंह घाटगे यांच्यावह हल्लाबोल केला. घाटगे फक्त जमिनीच्या तुकड्याचे वारसदार असल्याचे टीका करत मुश्रीफ राजर्षी शाहू महाराज विचारांचे वारसदार असल्याचा असल्याचे भैय्या माने म्हणाले. सूर्यकांत पाटील यांनीही घाटगे यांना जोरदार टोला लगावताना आम्ही तोंड उघडल्यास पळताभुई थोडी होईल, असा इशारा दिला.