कोणी कितीही मोठ्या बापाचा असो. अजित पवारांनी ठणकावले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज्यघटना आणि कायद्यानुसार सर्वांनी वागले पाहिजे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायदा बिघडविण्याचा प्रयत्न कुणी केला, तर तो कितीही मोठ्या बापाचा असो, सत्ताधारी पक्षाचा अथवा विरोधी पक्षाचा असो, त्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठणकावले.
रांजणगाव येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामसचिवालय इमारतीसह अन्य विकासकामांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार ॲड. अशोक पवार, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, पंचायत समितीचे माजी उपसभापदी आबासाहेब पाचुंदकर, सरपंच सर्जेराव खेडकर आदी त्यावेळी उपस्थित होते.
अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदा टीका केली. ते म्हणाले, राज्यातील सत्ताधाऱ्यांना लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ नाही. हे सरकार चक्रव्युहात अडकले असून फोडाफोडीचे राजकारण करीत आहे. सध्या काही जण बेताल वक्तव्ये करीत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. महाविकास आघाडीच्या सरकारने कोरोना काळात शासनाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन कमी केले नाही किंवा उशीर केला नाही.
राज्यात बेरोजगारी वाढत आहे. राज्यकर्त्यांना त्याचे काही घेणे नाही, असे सांगून पवार म्हणाले, वेदांत फॉक्सकॉनमुळे २६ हजार २०० कोटींचा जीएसटी राज्याला वर्षाला मिळणार होता. दीड लाख रोजगार मिळणार होते, ते आता होणार नाही. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात होणारा तीन हजार कोटींचा बल्क ड्रग प्रकल्पसुद्धा बाहेर गेला. यात ८० हजारांना रोजगार मिळणार होता. त्यालाही मुकावे लागले. मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावर रांजणगाव येथे इलेक्ट्रिक क्लस्टर उभारण्याचे जाहीर करण्यात आले. येथे ५०० कोटींच्या गुंतवणुकीतून पाच हजारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कुठे दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि कुठे ही ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक.’