“राजाचा मुलगा राजा नाही बनणार.” बंडाचं निशाण फडकवत भाजपाच्या शुभांगी पाटील मातोश्रीवर दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही अपक्षांची निवडणूक असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा प्रतिदावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला.
त्यानंतर आज भाजपाच्या नेत्या शुभांगी पाटील या मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत. शुभांगी पाटील यांनी देखील नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेला आहे. त्यांना भाजपाचा अधिकृत पाठिंबा मिळेल, अशी शक्यता होती. मात्र भाजपा काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांच्याबाजूला झुकत असल्याचे दिसत शुभांगी पाटील यांनी मातोश्री गाठून ठाकरे गटाचा पाठिंबा मिळतो का? याची चाचपणी सुरु केली आहे.
शुभांगी पाटील यांनी एक व्हिडिओ प्रसारीत करुन त्यांची भूमिका मांडली आहे. “महाविकास आघाडीने आपला अधिकृ उमेदवार निश्चित केला होता. त्यांना एबी फॉर्म देखील दिला. तसेच भाजपकडून दोन जणांना उमेदवारी मिळेल असे सांगण्यात येत होते. त्यातही शुभांगीताई तुम्हाला एबी फॉर्म देऊन असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले. मात्र दुपारी अडीच वाजता काँग्रेसच्या नेत्याने स्वतःचा अर्ज न भरता स्वतःच्या मुलाचा अपक्ष अर्ज भरला. एवढी नाट्यमय घडामोड कधीही नाशिक पदवीधर निवडणुकीत घडली नव्हती. विचित्र राजकारणाला आपण सामोरे जात आहोत. सामान्य घरातल्या मुलीने राजकारणात पुढे येऊच नये, असे काहींना वाटत आहे. राजाचा मुलगा राजा नाही बनणार. ज्याच्यामध्ये कसब आहे, तोच राजा बनणार. संपूर्ण महाराष्ट्राला माझे कर्तृत्व माहीत आहे. भाजपकडे मी अनेक दिवसांपासून उमेदवारी मागत होते. भाजपनेही माझे काम मान्य केले होते. पण राजाच्या मुलाला राजा बनविण्यासाठी माझे बलिदान देण्यात येत आहे. पण माझ्यासाठी माझे पदवीधर बांधव, डॉक्टर, शिक्षक यांनी घरोघरी जाऊन अर्ज भरले आहेत. त्यामुळे मी ही निवडणूक लढविणारच”, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
कोण आहेत शुभांगी पाटील?
महाराष्ट्र राज्य टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा शुभांगी पाटील यांनी २२ सप्टेंबर २०२२ रोजी भाजपामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला होता. ॲड. शुभांगी पाटील – सूर्यवंशी या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात एकमेव महिला उमेदवार आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या क्षेत्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांच्या आणि ५४ तालुक्यांच्या समावेश होतो. मागच्या तीन टर्म काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र यावेळी त्यांनी अचानक माघार घेऊन आपला मुलगा सत्यजित तांबे याचा अपक्ष अर्ज त्यांनी भरला. नाशिकच्या पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये आता २२ अपक्ष मैदानात राहिले आहेत.