सुधीर तांबेंनी पक्षाला फसवलं, सत्यजीतला अजिबात पाठिंबा देणार नाही ; नाना पटोलेंनी थेटच सांगितलं…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सुधीर तांबे यांनी पक्षाला फसवलं आहे. त्यामुळं नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे.
काल झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला दिला आहे. याबाबतचा पुढील निर्णय हायकमांड घेईल. मात्र, काँग्रेस बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांनी सकाळी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
भाजपकडून दुसऱ्याची घरं फोडण्याचं काम
काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षाला फसवलं असल्याचे नाना पटोले म्हणाले. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळं काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार नसल्याचे पटोले म्हणाले. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवरही टीका केली. भाजप भय दाखवून घरं फोडण्याचं काम करत असल्याची टीका पटोले यांनी केली. भाजप आज दुसऱ्याची घरं फोडून आनंद घेत आहे. पण ज्यादिवशी भाजपचे घर फुटेल त्यादिवशी त्यांना घरं फोडण्याचे दु:ख काय असते ते कळेल असे पटोले म्हणाले.
बाळासाहेब थोरात काल संपर्कात होते, मात्र आज संपर्कात नाहीत
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत कालपर्यंत संपर्क होता. आता ते संपर्कात नाहीत असे नाना पटोले म्हणाले. काँग्रेस पक्षाला धोका देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही पटोले म्हणाले. नागपूर शिक्षक मतदार संघाचा अंतिम निर्णय 15 जानेवारी पर्यंत घेतला जाईल असेही ते म्हणाले.
डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई होणार का?
नाशिक प्रकरणावरून डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात दिल्लीतील हाय कमांडकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशची मागणी केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. नाशिक निवडणुकीत नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती हायकंमाडला देण्यात आली आहे. सत्यजित तांबे यांना उमेदवारी काँग्रेसकडून पाहिजे अशी कोणतीही मागणी केली नव्हती. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाने उमेदवारी फॉर्म हा कोरा दिलेला होता. त्यामुळं सुधीर तांबे यांना निवडणूक लढवायची नव्हती तर सत्यजित तांबे यांचेही नाव टाकण्यास पक्षाची हरकत नव्हती असं काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यानं म्हटलं आहे. तांबे कुटुंबीयांनी अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याचा आरोप आहे. त्यामुळं सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिल्लीतील हाय कमांडकडे करण्यात आली आहे.