”… तर उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘एक कर्तबगार माणूस आपल्याला मुख्यमंत्रिपदी बसावयाचा आहे, मग ती महिला असू की पुरुष’ असे विधान केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीतील महिलांची नावे चर्चेत आली आधी खासदार सुप्रिया सुळे, नंतर रश्मी ठाकरे, याच चर्चेत आणखी एक नाव आलं ते म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच या व्यक्तव्याचा संदर्भ देत माजी मंत्री आणि भाजप नेते लक्ष्मण ढोबळे यांनी सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.
ते म्हणाले की, राज्यात जर कधी मुख्यमंत्री पदासाठी महिला आरक्षण करायची वेळ आलीच तर चळवळीत काम केलेल्या सुषमा अंधारे या पहिल्या क्रमांकाच्या दावेदार ठरतील. तर महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे त्यांच्यासाठी पक्ष पणाला लावतील, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. शिवसेनेच्या फायर ब्रॅंड म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
पुढे बोलताना भाजप नेते लक्ष्मण ढोबळे म्हणाले, आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेल्या सुषमा अंधारे या सातत्याने भाजपवर टीका करत असतात याचं मला दुःख होतं. आम्हीही आंबेडकरी चळवळीत असताना भाजपवर टीका करत होतो. मात्र जेंव्हा आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला त्यावेळी भाजपची तत्वे आम्हाला पटली. आपल्या देवाला चांगले म्हणायचं अन् दुसऱ्याच्या देवाला नावे ठेवायचे काय? कारण असा प्रश्नही ढोबळे यांनी सुषमा अंधारे यांना केला आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ३० नोव्हेंबरला एका कार्यक्रमात बोलताना ‘एक कर्तबगार माणूस आपल्याला मुख्यमंत्रिपदी बसावयाचा आहे, मग ती महिला असू की पुरुष’ असे विधान केले होतं. त्यामुळे ठाकरे यांच्या मनात नेमकं कुणाचं नाव आहे, अशी चर्चा राज्यात सुरू झाली होती.