शिवसेनेची ताकद वाढणार, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेही हसले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम राहिला नाही. शिंदे गट आणि भाजपला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि वंचित आघाडी एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे.
खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच आता, ‘ताबडतोब युती झाली तर चांगलंच आहे’ असे स्पष्ट संकेत दिले आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचार वाचकांपर्यत पोहचविणाऱ्या अद्ययावत अशा ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एका मंचावर आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
‘महाराष्ट्रामध्ये सध्या जे सरकार आहे, ते सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीवर चालू आहे.
त्यामुळे सुप्रीम कोर्टाला आमची विनंती आहे. त्यांनी स्थगितीचे जे आदेश दिले आहे, त्यावर तातडीने निर्णय घ्यावा. हा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा नाही’ असं परखड मत आंबेडकर यांनी मांडलं. ‘एकत्र कधी येणार आहोत, याचा प्रश्न आला आहे, निवडणुका कधी होतात यावर आम्ही निर्णय घेणार आहोत.
ताबतोब जर निर्णय झाला तर चांगलं आहे, आता झाला तर चांगलाच आहे’ अशी सूचक प्रतिक्रिया आंबेडकर यांनी दिली.
तर, उद्धव ठाकरे म्हणाले, की आज एक प्रकारे कौटुंबिक रूप पाहायला मिळत आहे. दोन नातू एकत्र आलेत. रामदास आठवले असे बोलले होते की तुम्ही प्रबोधनकरांचे नातू आणि आम्ही वैचारिक नातू.
प्रकाश आंबेडकर यांना भेटताना वेळ काढावा लागतो. आमचे वैचारिक व्यासपीठ एक आहे. दोन विचारांचे वारसे पुढे घेऊन जात आहोत, असं वक्तव्य ठाकरे यांनी केलं आहे. या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘प्रबोधनकार यांच्या विचारांच्या मुशीतून आम्ही तयार झालो. माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे. काही आजोबा आता बोलत आहेत, त्यांचे नातू काय बोलतात माहीत नाही. वाट दाखवणारे महत्वाचे वाट लावणारे नव्हे. मुखवटा लावुन राज्य करत आहेत, तोडा फोडा आणि राज्य करा, हे सध्या सुरू आहे. बाळासाहेबांनी कधीही कोणाला जात विचारली नाही’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.