भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने शिवछत्रपतींना माफीवीर म्हटलं तरी राज्य भाजप शांत, तर सावरकरांसाठी रस्त्यावर उतरलेल्या मनसेचा डिजिटल निषेध…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- वीर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली. ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली,’ या राहुल गांधींच्या विधानाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणातही उमटले.
या विधानावरून राहुल गांधींना उत्तर देताना भाजपच्या प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापाठोपाठ भाजप प्रवक्त्यानं केलेल्या विधानावरून काँग्रेसनं टीकास्त्र डागलंय.
वीर सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याच्या राहुल गांधींच्या आरोपाला भाजपकडून प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं दिसत आहे. त्यातच आता भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानानं नव्या वादानं डोकं वर काढलंय. भाजपचे प्रवक्ते सुधाशू त्रिवेदी यांनी आज तक वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात हे विधान केलं.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी वीर सावरकरांच्या त्या पत्रासंबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, “त्यांनी (राहुल गांधी) जो सांगण्याचा प्रयत्न केला सावरकर यांनी माफी मागितली आहे, तर माफीनाम्याची जो गोष्ट आहे ती त्या काळात खूप जण तुरूंगातून बाहेर पडण्यासाठी एका फॉरमॅटमध्ये लेखी पत्र द्यायचे, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबला पत्र लिहिली होती, पण त्याचा अर्थ शपथ तर घेतली नव्हती ना”, अशी धक्कादायक आणि संतापजनक प्रतिक्रिया देत वीर सावरकरांचा त्या ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्रावर बचाव सुरु केला. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळे भाजप यावर काय उत्तर देणार ते पाहावं लागणार आहे.
सावरकरांसाठी भाजप, शिंदे गट आणि मनसे रस्त्यावर, पण शिवछत्रपतींसाठी ?
वीर सावरकरांसाठी भाजप, शिंदे गट आणि मनसे रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. मात्र हे तीनही पक्ष शिवछत्रपतींचा अपमान झाल्यावर मात्र शांत आहे. वीर सावरकरांसाठी रस्त्यावर उतरवून आक्रमक झालेले मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता मात्र डिजिटल निषेधात व्यस्त झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे मनसेच्या नेतृत्वाच्या राजकीय हेतूवर समाज माध्यमांवर मोठी टीका होताना दिसत आहे.