आदित्य ठाकरेंचे शिंदे सरकारला आठ प्रश्न ; म्हणाले, “हे खोके सरकार या प्रश्नांचं उत्तर…!”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे गट व शिंदे गट यांच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या मुद्द्यावरून राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात असून हे प्रकल्प उद्धव ठाकरे सरकारच्या काळातच बाहेर गेल्याचा दावा शिंदे गट व भाजपाकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यांवरून त्यांनी ठाकरे सरकारवर परखड शब्दांत टीका केली असून महानगर पालिकेत सध्या टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास चालू असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आज आदित्य ठाकरेंनी ट्विटरच्या माध्यमातून शिंदे सरकारला आठ प्रश्न विचारले आहेत.
आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या विविध मुद्द्यांवर राजकीय पक्ष आक्रमक होताना दिसत आहेत. विशेषत: भाजपा आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारला काही प्रश्न केले आहेत. “या आठ प्रश्नांचं उत्तर देईल का खोके सरकार?” असा प्रश्नही त्यांनी ट्वीटमध्ये विचारला आहे.
“महाराष्ट्रातून उद्योग पळवले, शेतकरी त्रासात आहे आणि आता मुंबईचं खच्चीकरण. हाच खरा हेतू या खोके सरकारचा”, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी या प्रश्नांसोबत लगावला आहे.
काय आहेत आदित्य ठाकरेंचे आठ प्रश्न?
१. मुंबईतील पाच हजार कोटींच्या रस्त्यांच्या निविदांसाठी कुणीच पुढे आलं नाही, की तुमचे कुणी पुढे आले नाहीत?
२. मुंबईत आम्ही हाती घेतलेली अनेक कामे खोके सरकारने थांबवली हे मुंबईचे खच्चीकरण असून हे नेमकं कुणासाठी चाललंय? यामागील नेमका सूत्रधार कोण? याचे उत्तर देऊ शकाल?
३. मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर नसताना एवढी उधळपट्टी कुणाच्या आदेशावरून होत आहे? ही कुणाची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे?
४. मंदिरांच्या कामावर, किल्ल्यांच्या कामावर, स्मारकाच्या कामावर स्थगिती आली आहे. हे खोके सरकारचे हिंदुत्व आहे का?
५. मुंबई महानगरपालिकेचा निधी मिंधे गटाच्या वाढीसाठी वापरला जातोय का? याचे उत्तर आहे का तुमच्याकडे?
६. रस्त्यांसाठी काढलेली टेंडर्स रद्द होत आहेत. चांगल्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या जात आहेत. इतका गडबड गोंधळ कुणाच्या इशाऱ्यावरून चाललाय? नक्की हे सरकार कोण चालवतंय?
७. मुंबई महापालिकेचा कारभार गेली २५ वर्षं शिवसेना पारदर्शकपणे चालवत आहे. आता प्रशासक बसल्यावर व खोके सरकार आल्यावर ही पारदर्शकता का दिसत नाही?
८. मुंबई महापालिकेच्या ११ सीबीएसई आणि एका आयसीएसई शाळेसाठी लागणारी राज्य सरकारची एनओसी अजून का दिली नाही?
आदित्य ठाकरेंनी हे प्रश्न उपस्थित केले असताना ठाकरे गट शिंदे सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.