महाराष्ट्रातून ‘हे’ पार्सल परत पाठवायची वेळ आली ; मनसे राज्यपालांविरोधात आक्रमक……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
यावरुन मनसेनंही त्यांच्यावर निशाणा साधला असून “हे पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवण्याची निश्चितच वेळ आली आहे,” अशा शब्दांत नवी मुंबई मनसेचे अध्यक्ष आणि प्रवक्ते गजानन काळे आक्रमक भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादीचे मिटकरी आक्रमक
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “महाराष्ट्राचे राज्यपाल सतत वादग्रस्त विधान करण्यात पटाईत आहेत. त्यांनी मागील काळात अनेक महापुरूषांबद्दल वादग्रस्त विधाने केले आहेत, मात्र त्यावर त्यांनी माफी मागितली नाही. आज परत त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. राज्यपालांच्या काळ्या टोपीखाली सडका मेंदू आहे”
संभाजी ब्रिगेडची टीका
तर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी देखील राज्यपालांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारींना त्यांनी महाराष्ट्र आणि शिवद्रोही म्हटलं आहे. तसेच तुम्ही सह्याद्रीच्या पर्वत रांगावर आणि गड किल्ल्यांवर फिरा म्हणजे तुम्हाला कळतील छत्रपती शिवाजी महाराज, उगाच उठून जीभ टाळ्याला लावायचे धंदे बंद करा”
राज्यपालांनी काय केलं होतं विधान?
औरंगाबाद इथं शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून डि. लिट. पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. ते म्हणाले, “तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला ते इथेच मिळतील”