संजय राऊतांच्या मागचं शुक्लकाष्ट संपेना…! आता ईडीने दाखल केली सुधारित याचिका……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पत्रा चाळ घोटाळाप्रकरणात नुकतेच तुरुंगातूनबाहेर आलेले उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या जामीनाविरोधात ईडीकडून हायकोर्टात सुधारीत याचिका दाखल करण्यात आली आहे.
खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करावा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे, तसेच या याचिकेवर २५ नोव्हेंबरला यावर सुनावणी होणार आहे.
मुंबई हायकोर्टात ईडीने ही सुधारित याचिका दाखल केली आहे, मागच्या वेळी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे ईडेनी याचिका दाखल केली होती, त्यामध्ये काही सुधारणा करून याचिका दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर ही नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे २५ नोव्हेंबरच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय होतं याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय राऊत यांना सत्र न्यायालयाने जामीन दिला होता. त्यानंतर ईडीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती, त्यानंतर तात्काळ सुनावणी होऊ शकली नव्हती. त्यामुळे राऊत तुरुंगातून बाहेर आले, तेव्हापासून ईडीकडून जामीन रद्द व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.