विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही :- सुषमा अंधारे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र राज्यात महिलांचा आदर न करणाऱ्या आणि महाराष्ट्रातील उद्योग व्यवसाय गुजरातकडे पळवून लाखो तरुणांना बेरोजगार केले. त्याच भाजपने इंग्रजांची कुटनीती वापरून शिवसेनेतील काही आमदारांना फोडून हात मिळवणी केली.
त्या भाजपसह गद्दार आमदारांनी मतदारांचा विश्वासघात केला आहे. त्या गद्दारांना येणाऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवून विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या प्रा.सुषमा अंधारे यांनी केले. (Kolhapur)
महाप्रबोधन यात्रेनिमित्त कुरुंदवाड येथील सभेत सुषमा अंधारे यांनी संवाद साधला. कुरुंदवाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बुधवारी सायंकाळी ही सभा पार पडली. या सभेत पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या की, मतदारांची दिशाभूल करुन जाती-धर्माचे विष पेरून आजपर्यंत भाजपने निवडणूक लढवली. (Kolhapur)
गद्दारो, ये पब्लिक है सब जानती है
जिल्ह्यातील पाच आमदारांसह राज्यभरातील ४० आमदारांनी गद्दारी व विश्वासघात केला. आता वेगवेगळी कारणे सांगून आम्ही कसे खुद्दार आहोत, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न गद्दारांकडून केला जात आहे. परंतु त्यांनी लक्षात घ्यावे की, ‘गद्दारो ये पब्लिक है सब जानती है’. वेळ येऊ द्या जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, या गद्दारांचा बुरखा महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून फाडणार आहे.
हे महिलांचे अपमान करणारे सरकार
फडणवीस शिंदे सरकारमधील अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासारख्या संसद पटूवर चुकीचे वक्तव्य केले जात आहे. महिलांच्यावर अत्याचार करणाऱ्यांचा सत्कार केला जातो. त्यांच्यावर भाजप गुन्हा दाखल करत नाही. ताई बाजूला व्हा, असे म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर मात्र विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो. ही कुठली लोकशाही आहे? घराणेशाहीचा वारसा चालवणारे भाजप सरकार आहे, असा हल्लाबोल अंधारे यांनी केला.
विश्वासघातकी खास धैर्यशील माने
माजी खासदार निवेदिता माने यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. माने घराण्यात गद्दारी ही नवीन नाही, तीच परंपरा खासदार माने यांनी जोपासली आहे. खासदार होण्यापूर्वी पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न हाती घेऊन या प्रश्नाचे त्यांनाच गांभीर्य आहे असा गवगवा करत आंदोलन केले होते. निवडून आल्यानंतर या प्रश्नाचा त्यांना विसर पडला आहे. ते याबाबत कधीच कुठेच काही बोलले नाहीत. हा जनतेबरोबर विश्वासघात नाही का? विश्वासघात करण्यात ते पटाईत आहेत. विश्वासघाताचा निष्ठावंतपणा त्यांच्याकडे असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यांना खासदार केले. माने यांना भविष्यात बॅलेट पेपरच्या माध्यमातून त्यांना जनता दाखवून देणार आहे.
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा विश्वासघात करुन यड्रावकर यांनी राजकारणात स्थान मिळविले
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या आशीर्वादावर सहकार क्षेत्रात यड्रावकर घराण्याने राजकारणात पदार्पण केले. त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसून ११० एकर जमीन असणारी पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट बळकावली. त्याची विल्हेवाट लावून हजारो युवकांना बेरोजगार करण्याचे पाप या घराण्याने केले आहे. सूतगिरण्या मोडकळीस आणून कामगारांना देशोधडीला लावण्याचे महान कार्य केल्याची टीका अंधारे यांनी यावेळी केली. यड्रावकर यांना आम्ही शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद दिले. त्यानंतर निधीच मिळाला नाही अशी आदळ आपट करत आपली गद्दारी लपवण्याचा यड्रावकर यांनी प्रयत्न केला. मात्र सध्या तालुक्यामध्ये ५५० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा डिजिटल फलक ते झळकवत आहेत. तो निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळातच मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांचा रिमोट उपमुख्यमंत्र्यांच्या हातात
महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सत्तेवर असलेल्या सरकारमधील मुख्यमंत्री हे मंत्रालयातील कामे करण्याऐवजी आरती आणि गर्भा दहीहंडी कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावत आहेत. मंत्रालयातील सर्व कामे उपमुख्यमंत्री फडणवीस करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे असले तरी त्यांचा रिमोट मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हातात आहे.
या कार्यक्रमासाठी उपनेत्या संजना घाडे, शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवाडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, माजी आमदार उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, महिला जिल्हाप्रमुख मंगलताई चव्हाण, शिरोळ तालुका संपर्क प्रमुख बाजीराव मालसुरे, तालुका प्रमुख वैभव उगळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.