शिंदेंना मोठा धक्का…! ठाण्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील ठाण्याच्या माजी नगरसेविका रागिणी भास्कर वेरिशेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना आपल्या गटात सामील करून घेतलं आहे. रागिणी शेट्टी आधी शिंदे गटात होत्या. मात्र, आता त्यांनी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
बालेकिल्ल्यातीलच शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केल्याने एकनाथ शिंदे यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. रागिणी भास्कर या शिवसेनेच्या ठाण्यातील पहिल्या नगरसेविका होत्या.
आज त्यांनी मातोत्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधलं आहे. त्यांच्यासह भास्कर वेरिशेट्टी साहिल वेरिशेट्टी आदींनीही शिवबंधन बांधून शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचे वचन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले .
याप्रसंगी शिवसेना उपनेत्या अनिताताई बिर्जे, खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख , ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर, ठाणे जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर आणि असंख्य कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली होती. सुरूवातीला आमदार, त्यानंतर खासदार आणि आता थेट पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शिंदे गटाची वाट धरली. मात्र, आता शिंदे यांच्या खेळीला उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सुद्धा सक्रिय झाले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले नगरसेवक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यास सुरूवात केली आहे.