देशात लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशभरात 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. विरोधकांच्या मतदार संघात आपला झेंडा फडकवण्यासाठी रणनीती आखली जात आहे.
याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात 2024 मधील लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रित होऊ शकतात का, असा सवाल मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी देशात 2 वर्षांनी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा या सार्वत्रिक निवडणुका एकत्र घेण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक बदल केल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी असेल. मात्र, हा निर्णय केंद्र सरकारच घेईल, अशी माहिती दिली.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार बोलत होते. “2024मध्ये होणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्रित घेणे आयोगाच्या दृष्टीने शक्य आहे. त्याबाबत आमची तयारी आहे. मात्र, हा धोरणात्मक निर्णय असून, हा विषय आमच्या अखत्यारित येत नाही. याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे. निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक घटकाला सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यात तरुण, तसेच तृतीयपंथीयांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न आहे”, असे आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले.
याशिवाय, “मतदानाच्या दिवशी कार्यालये, तसेच खासगी कंपन्यांना सुट्टी जाहीर केली जाते. मात्र, मतदार त्या सुट्टीचा आनंद घेत मतदानाकडे पाठ फिरवितात. त्यामुळे उद्योजक, विद्यापीठे, विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांशी आम्ही संवाद साधत असून, त्यांच्यात मतदान प्रक्रियेबाबत जनजागृती करीत आहोत”, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, तृतीयपंथीयांना स्वतःची ओळख मिळावी यासाठी महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे प्रमुख श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. “तृतीयपंथीयांना स्वतःची ओळख पटवून देणारे कोणतेही कागदपत्र किंवा ओळखपत्र अद्याप तयार झालेले नाही. याबाबतची निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांना ओळखपत्रे कशा पद्धतीने देता येतील, याबाबत महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे प्रमुख श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे”, असेही त्यांनी सांगितले.