महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद मिटणार…? पंतप्रधानांच्या मध्यस्थीनंतर आज पहिल्यांदाच होणार ‘ही’ बैठक……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद सुरू आहे याप्रकरणी नेहमीच दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला आहे. तर हा संघर्ष मिटविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच या प्रश्नात मध्यस्थी केली आहे.
संपूर्ण कोल्हापूर शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या प्रकरणात मध्यस्थी केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार सीमाभागातल्या प्रश्नांबाबत आज कोल्हापूरमध्ये मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत तसेच सीमाभागातील दोन्ही राज्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण कोल्हापूर शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या बैठकीच्या माध्यमातून अनेक दशकांपासून सुरू असलेल्या बेळगाव सीमाप्रश्नावर तोडगा निघणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदींची सीमावाद प्रश्नात मध्यस्थी: गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद सुरू आहे याप्रकरणी नेहमीच दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला आहे. तर हा संघर्ष मिटविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच या प्रश्नात मध्यस्थी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार येत्या कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब येथे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये मंथन बैठक होत आहे. या बैठकीला दोन्ही राज्याचे राज्यपाल तसेच सीमा भागातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी सहभागी होणार आहेत. दोन्ही राज्यातील सीमा भागातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी काल रात्रीच कोल्हापुरात दाखल झाले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकची अशाप्रकारे व्यापक आणि संयुक्त बैठक या आधीकधीच झाली नव्हती.
बैठकीत या विषयांवर होणार चर्चा: रेसिडेन्सी क्लबमध्ये सकाळी ११ ते १ या वेळेत होणाऱ्या बैठकीत या भागांतील अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न दोन्ही राज्यांकडून केला जाणार आहे. अलमट्टी धरणाचा फटका कोल्हापूर आणि सांगलीला पुरामुळे बसतो, याधरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने पुढे आणला आहे. मात्र याला महाराष्ट्र सरकारने तीव्र विरोध दर्शवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराला कारणीभूत असलेल्या अलमट्टी धरणाची पाणीपातळी, आजरा तालुक्यातील किटवडे प्रकल्प, गोवा राज्यातून अवैध पद्धतीने होणारी दारू वाहतूक, लम्पी रोग, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, सीमाभागातील विद्यार्थ्यांचे दाखले, कर्नाटकातून येणारे हत्ती, कोरोना काळातील अनुदान, गर्भलिंग निदान चाचणी अशा विविध समस्यांसंदर्भात या विषयावरही बैठकीत चर्चा होणार आहे.
शहराला पोलीस छावणीचे स्वरूप
कोल्हापूर शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कारण आज कोल्हापूर शहरात केवळ महाराष्ट्र नाहीतर कर्नाटक राज्यातील डझनभर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. यांच्यासोबत या दोन्ही राज्यांचे राज्यपालही असणार आहेत. दोन्ही राज्यामध्ये पंतप्रधानाच्या आदेशानुसार पहिल्यांदाच बैठक पार पाडत आहे. यामुळे दिवसभर शहरात पोलिसांकडून विविध ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने मॉकड्रिल ही पार पडले आहेत. शासकीय विश्रामगृहातदेखील लाल कार्पेटसह सुरक्षेच्या अनुषंगाने मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. तर शेकडो पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.
काय आहे इतिहास?
एक नोव्हेंबर 1956 साली केंद्र सरकारने मुंबई प्रांतात असणारे बेळगाव धारवाड विजापूर कारवार हे चार जिल्हे म्हैसूर प्रांतात समाविष्ट केले. यामुळे 1956 सालापासून एक नोव्हेंबर हा दिवस बेळगाव येथे मराठी भाषिकांकडून काळा दिवस म्हणून पाळला जातो. बेळगाव निपाणीसह अनेक गाव हे महाराष्ट्रात येण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र कर्नाटक राज्याकडून हे जिल्हे महाराष्ट्राला देण्यास विरोध आहे. यामुळे बेळगाव येथे मराठी भाषिक आणि कन्नड सरकार यांच्यामध्ये नेहमीच संघर्ष पाहायला मिळाला आहे. तर महाराष्ट्रातूनही शिवसेनासह अनेक पक्ष बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहेत.